2मनश्शेच्या राहिलेल्या वंशजांनाही त्यांच्या कुळांप्रमाणे विभाग मिळाले ते असे, अबीयेजेर व हेलेक व अस्रियेल व शेखेम व हेफेर व शमीदा हे आपआपल्या कुळांप्रमाणे योसेफ पुत्र जो मनश्शे त्याच्या वंशातले पुरुष होते, त्यांच्या निरनिराळ्या कुळांसाठी हे विभाग ठरले;
3मनश्शेचा पुत्र माखीर, याचा पुत्र गिलाद, याचा पुत्र हेफेर, याचा पुत्र सलाफहाद, याला मुलगा नव्हता, परंतु मुली होत्या; आणि त्याच्या मुलींची नावे ही आहेत: महला व नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
4आणि एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व अधिकारी यांच्यापुढे त्या येऊन त्या म्हणाल्या, “परमेश्वराने मोशेला अशी आज्ञा दिली की आम्हांला आमच्या भाऊबंदांमध्ये वतन द्यावे.” यास्तव त्याने परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे त्यांना त्यांच्या वडिलाच्या भाऊबंदांमध्ये वतन दिले.
5आणि यार्देनेच्या पश्चिमेकडे गिलाद व बाशान या प्रांतांखेरीज मनश्शेला दहा भाग मिळाले.
6कारण की मनश्शेच्या मुलींना त्याच्या मुलांमध्ये वतन मिळाले, आणि मनश्शेच्या इतर वंशजांना गिलाद प्रांत मिळाला.
7आणि मनश्शेची सीमा आशेरापासून शखेमाच्या समोरल्या मिखमथाथा नगरापर्यंत झाली, आणि ती सीमा एन-तप्पूहाच्या लोकवस्तीच्या उजव्या भागापर्यंत पोहचते.
8तप्पूहा प्रांत मनश्शेचा होता, परंतु मनश्शेच्या सीमेजवळचे तप्पूहा नगर एफ्राइमाच्या वंशाचे होते.
9आणि सीमा काना ओढ्यावरून, ओढ्याच्या दक्षिणेस गेली; ही नगरे एफ्राइमाची होती, ती मनश्शेच्या नगरांमध्ये होती; आणि मनश्शेची सीमा ओढ्याच्या उत्तरेस होती, आणि तिचा शेवट भूमध्य समुद्राजवळ होता.
10दक्षिणभाग एफ्राइमाचा, आणि उत्तरभाग मनश्शेचा, आणि समुद्र त्याची सीमा होता, आणि उत्तरेस आशेरात व पूर्वेस इस्साखारात ते एकत्र झाले.
11आणि इस्साखारात व आशेरात बेथ-शान व त्याची खेडी, आणि इब्लाम व त्याची खेडी, आणि दोर व त्याची खेडी यामध्ये राहणारे, आणि एन-दोर व त्यांची खेडी यामध्ये राहणारे, आणि तानख व त्यांची खेडी यांत राहणारे, आणि मगिद्दो व त्यांची खेडी यांत राहणारे, हे तीन परगणे मनश्शेचे झाले.
12पण या नगरातील रहिवाश्यांना मनश्शेचे वंशज बाहेर घालवायला समर्थ नव्हते; या देशातच राहण्याचा कनान्यांनी तर हट्ट धरला.
13तरी असे झाले की जेव्हा इस्राएल लोक बळकट झाले, तेव्हा त्यांनी कनान्यांना नेमलेले काम करायला लावले आणि त्यांना अगदीच घालवून दिले नाही.
14तेव्हा योसेफाचे वंशज यहोशवाला म्हणाले की, “परमेश्वराने मला येथपर्यंत आशीर्वाद दिला आहे आम्ही संख्येने बहुत झालो आहो तर तू चिठ्ठी टाकून आम्हांला वतनाचा एकच विभाग का दिला आहेस?”